घरताज्या घडामोडीशिवाजी महाराजांनीसुद्धा कोरोनाच्या संकटात रयतेच्या रक्षणास कठोर निर्बंध लावलेच असते - सामना...

शिवाजी महाराजांनीसुद्धा कोरोनाच्या संकटात रयतेच्या रक्षणास कठोर निर्बंध लावलेच असते – सामना अग्रलेखातून विरोधकांवर टीका

Subscribe

दक्षिण आफ्रिकेतील देशांनी कोरोनाची लसीची १० लाखांची खेप हिंदुस्थानला परत पाठवण्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. बहुतेक तिकडे कोरोना आडदांड आहे. लसीने तो मरणार नाही हे एकंदरीतच दिसत आहे. महाराष्ट्र सरकारनेही आता आडदांडपणे वागावे नाहीतर, नाहीतर कोरोना पुन्हा हाहाकार माजवेल. विरोधकांनी स्वतः नियम पाळावेत. लग्न, सार्वजनिक कार्यक्रम, सभा, संमेलने या ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रण हवेच, मास्कची सक्ती तर असायला हवी. नियम मोडणाऱ्यांना कठोर शासन होणे गरजेचे आहे. १९ तारखेस शिवजयंतीच्या निमित्तानेही राजकारण झालेच. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा कोरोनाचे संकट पाहता रयतेच्या रक्षणासाठी कठोर निर्बंध लावलेच असते हे विरोधकांनी समजून घेतले पाहिजे अशा शब्दात आज शनिवारच्या सामन्यात विरोधकांचा समाचार घेण्यात आला आहे.

राजकीय मेळावे, लग्न समारंभ, तसेच बहुतेक सर्वत्र लोक मास्क लावत नाहीत की सुरक्षित अंतर ठेवताना दिसत नाहीत. लोक बेपर्वा का आहेत ? अशीच परिस्थिती राहिली तर कोरोनाची लाट, नव्हे तर लाटा येतील असा इशारा कोरोनासंदर्भातील राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिला आहे. निदान डॉक्टरांचे तरी एका अशा शब्दात सामनातून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेताही अनेकदा मास्क न लावता अनेक कार्यक्रमात वावरतात. हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाही, पण नेते म्हणून ते जनतेला कोणता संदेश देत आहेत ? असा सवाल करण्यात आला आहे. पश्चिम बंगालात भाजपला विजय मिळवायचा आहे हे ठीक, पण अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. बंगालातील जाहीर कार्यक्रमात गृहमंत्री व त्यांचे सहकारी मास्क न लावता किंवा मास्क नाकाखाली ओढून ममता दीदींवर हल्ले करत आहेत. अशा स्थितीत कोरोनाने दगाफटका केला तर कसे व्हायचे ? आम्हाला त्यांच्या तब्येतीची चिंता वाटते म्हणून हे सांगायचे. मास्क हीच लस आहे याचा विसर लोकांना पडलेला आहे.

- Advertisement -

हे उघडा, ते उघडा नाहीतर आंदोलने करू अशी आंदोलने विरोधक करत राहिले, कोरोनाच्या नियमांचेही राजकारण केले गेले. त्याचा फटका जनतेला, राज्याला बसत आहे. मध्यंतरी कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होती. मात्र त्यामुळे बेजबाबदारपणा पुन्हा सुरू झाला. त्या बेजबाबदारपणास विरोधकांनी इतके खतपाणी घातले की सरकारलाच जणू खलनायक केले. आता जो कोरोना वाढत आहे, त्याची जबाबदारी राज्यातील विरोधक घेणार आहेत का असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. अमरावती, यवतमाळ, अकोल्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे त्याठिकाणी जमावबंदी केली. पण सरकारने एखादा निर्णय घेतला की विरोधकांनी थयथयाट करायचा, हे लोकांच्या सुरक्षे्च्या दृष्टीने बरे नाही. लोकल ट्रेन्स सुरू झाल्या, बाजार उघडले, पण लोक नियमांचे पालन करायला तयार नाहीत, हे कसे चालेल ? सार्वजनिक ठिकाणी परस्परांतील अंतर राखणे, मास्क लावणे ही बंधने पाळली गेलीच पाहिजेत असेही सुचविण्यात आले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -