मुंबई – महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत शिंदे सरकारवर टीका केली.
हे सरकार अद्याप विधीमान्य नाही –
ज्या पद्धतीने सरकार सत्तेवर आले ते अद्याप विधीमान्य नाही. शिंदे सरकार लोकशाही आणि संसदीय परंपरेच्या चिंधड्या उडवत स्थापन झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात या सरकारच्या भवितव्याबाबत प्रलंबित असून त्यावर काहीही निकाल लागला नाही. त्यातच अधिवेशन कमी कालावधीचे आहे. आम्ही दहा दिवस अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर विचार करू असे सांगण्यता आल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
ओला दुष्काळ जाहीर करा –
राज्यात अतिवृष्टी झाली आहे. वैणगंगा नदीला पूर आला आहे. भंडारा, गोंदीयामधील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ज्याप्रकारे मदत व्हायला हवी होती, ती शेतकऱ्यांना झालेली नाही. हे मुद्दे आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत. अतिवृष्टी ग्रस्तांच्या मागण्या आहेत. ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ७५ आणि बागायतीसाठी दीड लाख रुपये मदत जाहीर करण्याची मागणी अजित पवारांनी केली. तसेच अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणीही अजित पवार यांनी केली.