लोकसभा निवडणुक २०१९नंतर राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली. महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या पहिल्याच दिवसापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरूवात केली होती. ‘मी पुन्हा येईन…’ असा नाराही त्यांनी दिला होता. शिवाय, या सरकारच्या स्थापनेनंतर फडणवीस यांनी एका शायरीच्या माध्यामातून आपली भुमिका मांडली होती आणि मी पुन्हा येईन असे सांगितले होते. “मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा”, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. दरम्यान, २०१९ साली केलेल्या फडणवीसांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी बंड पुकारला. त्यानंतर बुधवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही क्षणातच सोशल मीडियावर देवेद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला.
मेरा पानी उतरता देख
मेरे किनारे पर घर मत बसा लेना
मैं समंदर हूँ
लौटकर वापस आऊँगा ! #Maharashtra #MaharashtraAssembly pic.twitter.com/erM8LJeQKi— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 1, 2019
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर भाजपाच्या आमदार आणि नेत्यांनी जल्लोष साजरा केला. शिवाय देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचप्रमाणे १ जुलै रोजी फडणवीस सरकार स्थापनेची घोषणा करू शकते.
राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द
राजीनामा दिल्यानंतर मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीहून स्वत: गाडी चालवत राजभवनात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही होते. राजभवनात उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला.
शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचण्याचे काम
ज्यांना शिवसेनेने,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले त्यांनीच शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रिपदावरून खाली खेचण्याचे काम केले आहे.याचे पुण्य त्यांच्या पदरात पडू देत.त्यांच्यावर मी विश्वास ठेवला हे माझे पाप आहे.मला पदावरून खाली खेचल्याचा आनंद त्यांच्यापासून मला हिरावून घ्यायचा नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.
हेही वाचा – उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, ३१ महिन्यांत आघाडी सरकार कोसळले