देशातील सर्वोच्च अशा लोकसभेच्या वास्तूचे म्हणजे नवीन संसद भवनाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात विधीवत पुजा करून सेंगोलची स्थापना करण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना आणि देशाला संबोधित केले. पण या कार्यक्रमाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना आमंत्रित करण्यात न आल्याने देशातील 20 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून खडाजंगी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना या कार्यक्राचे व्हॉट्सअॅपवर आमंत्रण मिळाल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतित्युत्तर दिले आहे. तर विरोधकांनी उद्घाटनाचा राजकीय डावपेच खेळला आहे, असा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. (Opposition played a political trick for the inauguration, Deepak Kesarkar alleges)
हेही वाचा – शिंदेंच्या ‘जमालगोटा’ वक्तव्याला जनताच उत्तर देईल, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना रोखठोक सुनावले
प्रसार माध्यमांनी दीपक केसरकर यांना उद्घाटन सोहळ्यावरून प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “आपण ज्या सदनात बसतो ते देशातलं सर्वोच्च सदन आहे. त्याचं उद्घाटन आहे हे सगळ्यांना माहिती होतं. त्यामुळे या उद्घाटनाच्या आमंत्रणाची वाट बघत राहणं हे लोकशाहीला धरून नाही. आमंत्रणाची वाट बघण्यापेक्षा विरोधी पक्षांनी कार्यक्रमाला जायला हवं होतं.”
देशाची संसद चालवायची सर्व जबाबदारी सत्ताधाऱ्यांची असते. पार्लमेंट ट्रेजरी बेंचद्वारे सगळा कारभार चालतो. खासदारांची बिलं पास करताना किंवा सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्रमांसाठी केंद्रातले मंत्री नेत्यांना, विरोधकांना फोन करतात. यांची कामं असतात तेव्हा हे फोन करतात. परंतु आजच्या कार्यक्रमाला बोलावण्यासाठी कोणाचाही फोन आला नाही. या सरकारमधल्या एखाद्या वरिष्ठ नेत्यांने अथवा मत्र्यांने सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना एक फोन केला असता तरी आम्ही सर्वजण राजीखुशीने या कार्यक्रमालो गेलो असतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
तर संसदेच्या नव्या इमारतीचं आज उद्घाटन आहे हे सगळ्यांना माहिती होतं. परंतु हे यांचे राजकीय डावपेच आहेत, जे लोकशाहीला धरून नाहीत, असा आरोप यावेळी दीपक केसरकर यांच्याकडून करण्यात आला. तसेच, सत्ताधारी पक्षातील आमदार हे त्यांच्याकडे पुन्हा जातील असे स्वप्न विरोधकांनी कायम पाहावे, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.