राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पिंपरी चिंचवडचे पालकमंत्री चंद्राकांत पाटील यांच्या अंगावर शनिवारी शाई फेकण्याचा प्रकार घडला. चिंडवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी सायंकाळी सहाच्या सुमारास चंद्रकांत पाटील उपस्थित होते, यावेळी ही घटना घडली. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पैठणमधील एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. या प्रकरणावरून शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. या टीकेवर आता चंद्रकांत पाटलांनी पलटवार केला आहे.
अंधारेच्या टीकेला प्रत्युत्तर देत पाटील म्हणाले की, हा हल्ला प्रीप्लॅन होता, याचे पुरावे मिळालेत. त्यामुळे गुन्हेगारी कलमांमध्ये कन्स्पायरी तयार करणे हा भयानक गुन्हा मानला जातो. त्याची सर्व कलमं आता लागतील, मी सुषमा अंधारेंना म्हणालो की, ताई शाईफेक करुन निषेध व्यक्त करायचा होता की जखमी करण्याचा प्लॅन होता? माझ्या डोळ्याला काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. त्यामुळे डोळ्याच्या आतील भागाचे मोठे ऑपरेशन करावे लागले होते. त्याच डोळ्यावर शाईफेक टाकली गेली. तसेच ज्या बाबासाहेबांचा अनादर झाला. शाईफेक करुन बाबासाहेबांचं संविधान पायदळी तुडवलं गेलं. ही कुठली पद्धत… हा भ्याड हल्ला आहे, अस पाटील म्हणाले.
पोलिसांच्या निलंबन कारवाईवर पाटील म्हणाले की, पोलिसांच्या निलंबनाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे. या प्रकरणात पोलिसांवर कारवाई नको, हे माध्यमांतून सांगितले. मात्र त्याला मी काहीही करु शकत नाही.
शाईफेक करणाऱ्यांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची कलमे लावण्यात आली, त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, याचा जाब प्रशासनाला विचारा, भुजबळांना, संजय राऊतांना जसा न्यायालयाने न्याय दिला तसा शाई फेक करणाऱ्यांना मिळेल, असही पाटील यांनी नमूद केले.