राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) हे सोमवारपासून (ता. 01 मे) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने त्यांनी जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात, तसेच नक्षलग्रस्त भागात जाऊन पाहणी केली. तसेच तेथील नागरिकांशी देखील संवाद साधला. आज मंगळवारी (ता. 02 मे) देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेमध्ये खरीप हंगामाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले असून याबाबत तत्काळ पावले उचलण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. तसेच शेतीशी संबंधित विविध गोष्टी शिकण्यासाठी शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा राबविण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत.
हेही वाचा – मी काही बोलल्यास बातमी होते; ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकावर अजित पवारांची प्रतिक्रिया
या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, गडचिरोलीत 70 टक्के जमिनीवर वन असल्याने यातील काही भागावर धानाचे पीक घेण्यात येते. यासाठी लागणाऱ्या खतांची, धानांची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे याची विक्री होताना विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. याबाबत डिलर्सची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अतिरिक्त सोलार पंपांची मागणी केली तर ते देखील देण्यात येतील, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात येईल.
गडचिरोलीतील शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा
शेती संदर्भातील ज्या काही नवीन पद्धती आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यशाळा या घेण्यात येणार आहेत. याबाबतचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांशी संवाद झाला पाहिजे, असा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जेवढ्या प्रमाणात कर्ज मिळाले पाहिजे, ते मिळत नाहीये. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष मोहिम राबवून शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश देण्यात आले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
तसेच, जिल्ह्यात बियाणांचा काळाबाजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या संदर्भात विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना याबाबत कडक शब्दात कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येणार आहे. तर जो व्यापारी किंवा डीलर बियाणांचा काळाबाजार करणार त्याचे लायसन्स रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा दोन कोटी रुपयांचा पीक विमा देखील तत्काळ देण्यात येणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.