शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर पन्नास खोक्यांवरून टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केली. मात्र सत्तारांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे, दरम्यान शिंदे गटानेही त्यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना 50 खोक्यांवरील टीकेवरून इशारा दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सातत्याने शिंदे गटातील आमदारांवर 50 खोके एकमद ओके म्हणत टीका करत असतात. मात्र या टीकेमुळे शिंदे गटातील आमदारही आता वैतागले आहेत. दरम्यान ही टीका करण्यात अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेनेचे 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार अशा एकूण 50 आमदारांच्यावतीने या तिनही आमदारांविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. अशी माहिती शिंदे गटातील प्रवक्ते विजय शिवतारे यांनी दिली आहे.
अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे या तीन नेत्यांनी शिंदे गटातील नेत्यांची बदनामी केली म्हणून जाहीरपणे माफी मागावी अन्यथा बदनामीच्या खटल्याला कायदेशीर मार्गाने सामोरे जा, असा इशारा शिंदे गटाने दिला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटाची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.
अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानाचे कोणीही समर्थन करणार नाही, त्यांचे विधान चुकीचेच आहे. मात्र हे विधान त्यांच्या तोंडून का बाहेर आलं याचाही विचार व्हायला हवा. वारंवार 50 खोके घेतल्याचा आरोप करत बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातूनचं संयम सुटल्यानेच अब्दुल सत्तार यांचे स्लीप ऑफ टंग झाले, असं विजय शिवतारे म्हणाले.
तसेच अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांनी अशी बदनामी केल्याने त्यांनी कोर्टात 50 खोके घेतल्याचे पुरावे सादर करावेत. अन्यथा 2500 कोटींच्या अब्रु नुकसानीच्या दाव्याच्या नोटीसा दिल्या जातील, असही शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे.