माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे. तरीही ही चौकशी म्हणजे भाजपकडून यंत्रणेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप म्हणजे उच्च न्यायालयाचा अवमान असून भाजप त्याच्या विरोधात अवमान याचिका दाखल करेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पिंपरीमध्ये बोलताना दिला. उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचा आदेश देताना गरज असल्यास गुन्हा नोंदविण्याचाही आदेश दिला होता. न्यायालयाचे निकालपत्र वाचले तर हे स्पष्ट होते. त्यामुळे केवळ चौकशीचा आदेश दिला होता. तरीही गुन्हा नोंदवून छापे मारले ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची तक्रारही निरर्थक आहे, असे पाटील म्हणाले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात बोलत होते. चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे की, शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सोईच्या भूमिका असतात. त्यांना अनुकूल निकाल लागला की न्यायालय चांगले आणि प्रतिकूल आदेश आला की शंका उपस्थित करतात. ईव्हीएम मशिनबाबतची त्यांची भूमिकाही निवडणुकीत विजय मिळाला अथवा पराभव झाला यानुसार बदलते, असा टोलाही त्यांनी लगावला.
विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपला जनादेश दिला होता. विश्वासघात झाल्यामुळे भाजप सत्ताधारी होण्याऐवजी विरोधी पक्ष झाला. परंतु, विरोधी पक्ष म्हणूनही भाजप आपली भूमिका गंभीरपणे आणि आक्रमकपणेच पार पाडेल, असेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा : महाराष्ट्रात लस उपलब्ध, ठाकरे सरकार लसीचं राजकारण करत असल्याचा दरेकरांचा आरोप