गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपामधून फुटून बाहेर पडलेले माजी विरोधी पक्षनेते, माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश केला. यानंतर भाजापावर खडसे नाराज असल्याने भाजपामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा देखील होती. दरम्यान ‘राज्यभरात भाजपाचे कार्यकर्ते नाराज आहेत. म्हणूनच ते राजीनामे देत आहेत’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपावर चांगलाच निशाणा साधला आहे.
अहमदगरमध्ये भाजपाच्या ३१० बुथप्रमुखांपैकी २५७ बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. आज सकाळी जळगाव येथील मुक्ताई निवासस्थानी ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
यावेळी पत्रकारांनी खडसेंना अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याबाबत विचारणा केली असता, खडसेंनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात झाली आहे. हे कार्यकर्ते नाराज आहेत, त्यामुळेच कार्यकर्ते राजीनामे देत आहेत. नाराजीचा हा परिणाम असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
भाजपाध्यक्षाच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांचा बंड
श्रीरामपूर तालुक्यातील भाजपाच्या ३१० बुथप्रमुखांपैकी २५७ बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्हा भाजपा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला असल्याचे सांगितले जात आहे.