इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकार, राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्यात येत होती, असा दावा ‘द वायर’सह जगभरातील १५ मीडिया संस्थांनी केला आहे. यावरुन देशातील राजकीय वातावरण तापलं असून याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले आहेत. कारण महाराष्ट्रात याआधिच फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव आणि प्रवक्ते संचिन सावंत यांनी फडणवीस सरकारच्या काळात पेगासस सॉफ्टवेअर वापरून महाराष्ट्रात ही हेरगिरी आणि फोन टॅपिंग झालं का? याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
“पेगासस कांड महाराष्ट्रात ही झाले का? याची चौकशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी,” अशी मागणी सचिन सावंत यांनी केली. “महाराष्ट्रात या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगासस सॉफ्टवेअरच्या वापराच्या बातम्या ही येत होत्या. कोणी IPS अधिकारी मंत्रालयात बसून या विषयावर काम करत होता का? DGIPR अधिकारी कोणाच्या परवानगीने इस्त्रायल ला गेले? कोणते प्रशिक्षण त्यांनी घेतले? परत येऊन अहवाल दिला का? पेगाससशी यांचा संबंध आहे का? निवडणूक काळात प्रचाराचे काम सोडून असे दौरे होणं आश्चर्यकारक व संशयास्पद आहे,” असं संचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
पेगॅसस कांड महाराष्ट्रात ही झाले का? याची चौकशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी आहे. महाराष्ट्रात या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगॅसिस सॉफ्टवेअर च्या वापराच्या बातम्या ही येत होत्या pic.twitter.com/0yux7h4PHp
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 19, 2021
सचिन सावंत यांनी एवढ्यावरच न थांबता अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. किती वेळा कोण अधिकारी इस्त्रायल गेले? NSO बरोबर शासकीय मिटींग झाल्या होत्या का? NSO शी कोणता पत्रव्यवहार झाला होता का? हे सर्व समोर आले पाहिजे. या अगोदर ही अशा चौकशीची मागणी करण्यात आली होती. दिग्विजय सिंह यांनीही मागणी केली होती. देशात पेगॅसिस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फोन टॅपिंग व त्यात मोदी सरकारची भूमिका हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सर्व भाजप शासित राज्य सरकारांना या कार्यपद्धतीवर काम करण्याचे निर्देश दिले असतील. महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या काळात झालेले फोन टॅपिंग यामागे समान मानसिकता आणि हेतू आहे,” असं सचिन सावंत म्हणाले.