भारतीय नागरिक परदेशात करोनाच्या विळख्यात अडकले असून त्यांना मायदेशात आणले जाणार आहे. या नागरिकांना मुंबईतील विविध सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येणार आहे. मुंबईतील कस्तुरबा, राजावाडी, कुर्लामधील भाभा, हिंदूजा आणि अंधेरीचे सेव्हन हिल या रुग्णालयांचा समावेश आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात खाटांची संख्या केवळ २८ होती. ती आता वाढवून १०० करण्यात आली आहे. तर अंधेरीच्या सेव्हन हिल रुग्णालयात जवळपास ४०० खाटांची सोय करण्यात आली आहे.
हेही वाचा – इराणमधून आज २०० भारतीयांना मायदेशात आणणार
दरम्यान, आज पहाटे १२९ प्रवासी दुबई-पुणे स्पाइसजेट विमानातून आले. या सर्व प्रवाशांची विमानतळावरच वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणीत एकाही प्रवाशामध्ये करोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दुबईवरुन पुण्याला आलेल्या विमानात ७४ पुरुष, ४१ महिला, १४ लहान मुले असे एकूण १२९ प्रवासी होते. त्यात ११८ भारतीय नागरिक तर ११ परदेशी नागरिक होते. दरम्यान, विमानातील एका २६ वर्षीय महिलेने तिला व तिच्या एक वर्षाच्या बाळाला कफ असल्याचे सांगितले. त्यामुळे या दोघांनाही नायडू रुग्णालयात अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.