पोलीस बदली अहवाल लीक प्रकरणात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलिसांकडून सकाळी 11 वाजता त्यांनी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र आता फडणवीस यांच्या सागर या राहत्या घरीच ही पोलीस चौकशी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव बीकेसी पोलीस ठाण्यात जाणार नाहीत, परंतु पोलीस अधिकारी फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन ही चौकशी करणार आहेत. अशी माहिती फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे.
फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले की, सहपोलिस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ.
मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात.
जयहिंद, जय महाराष्ट्र!
सहपोलिस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 12, 2022
त्यामुळे बीकेसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जात त्यांचा जबाब नोंदवून घेणार आहेत. पोलीस बदली घोटाळा प्रकरणाचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी फडणवीसांना बीकेसी सायबर पोलीस ठाण्याच चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर फडणवीसांनी चौकशीसाठी आपण हजर राहू असे स्पष्ट केले. मात्र कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये म्हणून पोलिसांनी फडणवीसांच्या राहत्या घरी चौकशी करत जबाब नोंदवू असे जाहीर केले.
भाजपकडून राज्यभरात आंदोलनाचा इशारा
देवेंद्र फडणवीसांविरोधात आलेल्या नोटीसनंतर आत भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर भाजपने आज राज्यभरात आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच फडणवीसांविरोधात आलेल्या नोटीसीची भाजप कार्यकर्त्यांकडून होळी करण्यात येणार आहे. अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
कोणत्या प्रकरणात फडणवीसांना आली नोटीस?
राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी पुण्याच्या तात्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. मात्र हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. यावर शुक्रवारी तातडीने सुनावणी पार पडली. याच प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र या गुन्हातून मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांना नुकताच दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने शुक्ला यांच्याविरोधात 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत. याच प्रकरणात आता फडणवीसांना चौकशी होणार आहे.