पंजाबमधील फिरोजपूर येथील होणारी भाजपची रॅली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे अचानक रद्द करण्यात आली. यामुळे देशभरात राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि काँग्रेसचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. तसेच मोदींच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमागील घटनेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात नाही ना? अशी शंका नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
नक्की काय म्हणाले नाना पटोले?
‘पंजाब मुख्यमंत्र्यांनी जो कार्यक्रम आखला होता, तो सुरक्षेच्या आधारावर आखला होतो. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने भाजप नौटंकी करत आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या १५ दिवसांपूर्वीपासून सुरक्षा व्यवस्था केंद्रातल्या गृहखात्याकडून पाहिले जाते. केंद्रीय एजेंन्सीच्या माध्यमातून माहिती घेतली जाते. कालच्या घटनेमध्ये पंजाबचे सरकार जबाबदार असल्याचे भासवून पुन्हा एकदा नौटंकीचा आधार घेऊन पाच राज्यांमध्ये निवडणुका जिंकता येतात का? असा प्रयत्न भाजपच्या वतीने चालला आहे का? खरंतर या घटनेच्या मागे गृहमंत्री अमित शहांचा हात तर नाहीये ना? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भाजप जनतेचे प्रश्न जी महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, गरीबांचे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांवरील लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी या पद्धतीचे मोदी नौटंकी करत आहेत,’ असे नाना पटोले म्हणाले.
पुढे नाना पटोले म्हणाले की, ‘पंजाबमधील घटनेच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, ज्याचे प्रमुख अमित शहा आहेत, ते तर नाही आहेत ना? म्हणून आता गृहमंत्र्यांनी याचे उत्तर दिले पाहिजे. या पद्धतीची नौटंकी करून काही डाव साधण्याचा हेतू नाही आहे ना? दरम्यान यासंदर्भात राज्य सरकारच्या वतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. शेतकऱ्यांचा विश्वासघात भाजपच्या केंद्रातल्या मोदी सरकारने केलाय, त्या विश्वासघातला उत्तर देण्याचा निर्णय देशातल्या शेतकऱ्यांनी घेतला आहे. देशाच्या शेतकऱ्यांना दहशतवादी, आंदोलनजीवी अशा पद्धतीच्या उपमा देणाऱ्या पंतप्रधानांच्या भाजपला धडा शिकवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे भाजपकडून हा अयशस्वी प्रयत्न सुरू झालेला आहे.’
ज्या ५ राज्याच्या निवडणुका लागणार आहेत, म्हणून हा कालचा अयशस्वी प्रयत्न आहे. शेतकऱ्यांवर पुन्हा आरोप थोपावायचा आहे. गेल्या काळात तीन कायद्यांविरोधात कोट्यावधी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यामध्ये ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला त्याची जबाबदारी माझी नाही, असं म्हणणारे देशाचे पंतप्रधान आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधायला पाहिजे होता. देशाच्या अन्नदात्यांसोबत एक शब्द बोलण्याची पंतप्रधानांना लाज वाटत असेल आणि पुन्हा हा आरोप शेतकऱ्यांच्यावर थोपवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर भाजपला देशातले शेतकरी माफ करणार नाहीत. याचे उत्तर पाच राज्यातल्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहेत, असे नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा – PM Modi security lapse: पंजाबच्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात, भाजपचा काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयावर मोर्चा