राज्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. संतत धार आणि कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह कोकणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड, चिपळूण, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, खेडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन राज्यातील पाऊस आणि कोकणातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे. तर गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या परिस्थितीचा आढावा घेत तात्काळ बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन आढावा घेतला असल्याचे पंतप्रधान कार्यालयानं ट्विट करुन माहिती दिली आहे. राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे. त्याचप्रमाणे कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची माहिती दिली. बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
Spoke to Maharashtra CM Shri Uddhav Thackeray and discussed the situation in parts of Maharashtra in the wake of heavy rainfall and flooding. Assured all possible support from the Centre to mitigate the situation. Praying for everyone’s safety and well-being. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2021
केंद्र सरकारकडून मदत पुरवणार
मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याशी संवाद साधला आहे. त्वरित सगळी व्यवस्था हेलिकॉप्टर किंवा बोटी किंवा अन्य लागणारी मदत करतो असे आश्वासन केंद्रीय मंत्री नित्यानंद यांनी दिलं आहे अशी माहिती राणेंनी दिली. तसेच दुसरे मंत्री यादव यांच्याशी बोललो असून वेळ पडली तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलेल परंतु संबंधित मंत्र्यांशी बोलणं झाले असून मदत करण्याचे आश्वासन या मंत्र्यांकडून करण्यात आले आहे. अशी माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला पूरपरिस्थितीचा आढावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी, कोकण विभाग आयुक्त, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री अनिल परब, सिंधुदूर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदीती तटकरे यांच्याशी चर्चा करुन तात्काळ आपत्कालीन विभागाकडून मदत पोहचवण्याचे आदेश दिले आहेत. पुराने वेढलेल्या गावांना शहरांतील नागरिकांना ताततडीने मदत पुरवण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.