मुंबई – लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशभरात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशात बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. त्यामुळे देशातील तरुण मेटाकुटीला आलेला असताना केंद्र सरकाने ७५ लाख रोजगार योजना जारी केली. या योजनेतील पहिल्या टप्प्याला महाराष्ट्रातून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील कार्यक्रमात संवाद साधला. भविष्यात महाराष्ट्रात अगणित रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी केंद्र सरकारकने शेकडो प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला.
हेही वाचा – सरकारी नोकर भरतीत पारदर्शकता येणार; महामेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी तब्बल २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर केले आहेत. यापैकी काही प्रकल्पांवर सध्या काम सुरू आहे किंवा काही प्रकल्प लवकरच सुरू होतील. महाराष्ट्रात केंद्र सरकारने रेल्वेचे जाळे विणण्यासाठी ७५ हजार कोटी आणि रस्त्यांसाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्र सरकार राज्यात इतकी मोठी रक्कम पायाभूत सुविधांवर खर्च करत असेल तर त्यामधून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होत असतात. त्यामुळे मला विश्वास आहे की, भविष्यात महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगाराच्या अगणित संधी निर्माण होतील.
हेही वाचा – साडेतीन महिन्यांत ७२ मोठे निर्णय घेतले; रोजगार मेळाव्यात शिंदेंची माहिती
केंद्र सरकार समाजातील निम्न आणि पिछाडीवर असलेल्या लोकांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारकडून ग्रामीण भागात बचत गटांना प्रोत्साहन दिले जात आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये बचत गटांमध्ये देशातील ८ कोटी महिला सहभागी झाल्या आहेत. या बचत गटांना केंद्र सरकारने साडेपाच लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे. या बचतगटांच्या माध्यमातून महिला स्वत: उत्पादन तयार करतात, तसेच इतरांनाही रोजगार देतात, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.