महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य संग्रामालाच नौटंकी म्हणत एका नव्या वादाला तोंड फोडणारे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामाचा अपमान झाला असून नरेंद्र मोदींनी हेगडेंचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वक्तव्याचा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध केला आहे.
महात्मा गांधी यांचे नाव घेऊन भाजप सत्तेत आली आहे. त्याच गांधीजींचा अपमान भाजपचे नेते करत आहेत. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हेगडेंचे म्हणणे अमान्य असेल तर त्यांनी हेगडेंची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी ट्वीट करुन केली आहे.
If Prime Minister @narendramodi thinks that the statement made by Hegde on Mahatma Gandhi is unacceptable, then he should expel Mr. Hegde or reprimand him at the least.@AnanthKumar_BJP
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 3, 2020
हे वाचा – महात्मा गांधींजींचा स्वातंत्र्यलढा म्हणजे ‘नाटक’- भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान
भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटक येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना गांधींजीवर टीका केली होती. महात्मा गांधी यांनी इंग्रजांशी संगनमत करुन स्वातंत्र्यलढा लढला होता, इंग्रजाबरोबर हातमिळवणी करुन स्वातंत्र्यासाठी आंदोलने करण्यात आली होती. तो खरा स्वातंत्र्यलढा नव्हता, असे वक्तव्य केले होते. तसेच गांधीजींचे आमरण उपोषण आणि सत्याग्रह हे एक नाटक होते, असेही वक्तव्य हेगडे यांनी केले होते.