मुंबई – रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय)पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) विलीनीकरणाचा आराखडा तयार केला आहे. दिल्लीस्थित युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत (युएसएफ) पीएमसी बँकेचे विलीनीकरण करण्याची ही योजना आहे. विलीनीकरण आराखड्यानुसार, पीएमसी बँकेतील ठेवी, मालमत्ता आणि दायित्त्व युएसएफ बँक स्वीकारणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ठेवीदारांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा मिळेल, असे आरबीआयचे म्हणणे आहे.
एखादी बँक स्थापन करताना तिला परवाना मिळवण्यासाठी कमीतकमी २०० कोटी रुपयांचे भांडवल अपेक्षित असते. मात्र, युएसएफ बँकेची स्थापना १,१०० कोटी रुपयांच्या भांडवलातून करण्यात आली आहे. युएसएफ बँकेत पीएमसी बँकेचे विलीनीकरण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून तयार करण्यात येत असलेल्या आराखड्याबाबत सल्ला आणि आक्षेप मागवण्यात आले आहेत. ते १० डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सादर करण्यास आरबीआयने सांगितले आहे. त्यानंतर विलीनीकरणाचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
युएसएफ बँक लिमिटेड ही सेंट्रम ग्रुप आणि भारतपे यांच्या भागीदारीतून स्थापन झाली आहे. या बँकेचे कामकाज स्मॉल फायनान्स बँक म्हणून १ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झाले आहे.