शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. यामुळे शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक गट आणि दुसरीकडे बंडखोर नेते एकनाथ शिंदे याचा एक गट अशा दोन गटांत आता शिवसेना विभागली गेली आहे. यामुळे शिवसेनेमुळे सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहे. राज्यात एकीकडे हा सत्ता संघर्ष पेटत असताना राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने थेट राजकारणातून आता सिनेसृष्टीत पदापर्ण केले आहे. या राष्ट्रवादीच्या नेत्याचे नाव म्हणजे मंत्री जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाड यांना राजकारणातील एक बहुचर्चित आणि रोखठोक मंत्री म्हणून ओळखले जाते. सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडमोडी वेगाने सुरु असताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सिनेसृष्टीत पदापर्ण केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी नुकतचं ट्विटरवर नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे, शाहू छत्रपती असं या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा एक टिझर व्हिडीओ नुकताच आव्हाडांनी शेअर केला आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाचा अनावरण सोहळा कोल्हापूरमध्ये दिमाखात पार पडला. या सोहळ्यास मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही हजेरी लावली होती. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या या पहिल्या चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे.
एक स्वप्न साकार होत आहे.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या भूमीला वंदन करून सिनेमाच्या रुपात घेऊन येत आहोत,लोकराजाची कथा
“शाहू छत्रपती”.
सहा भाषांमध्ये भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर २०२३मध्ये.@ShahuFilm@thevarrun pic.twitter.com/79Xf34PUtu— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 25, 2022
जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका पोवाडा ऐकण्यास मिळतोय. आव्हाडांनी हा व्हिडीओ शेअर करत ‘एक स्वप्न साकार होत आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या भूमीला वंदन करून सिनेमाच्या रुपात घेऊन येत आहोत लोकराजाची कथा ‘शाहू छत्रपती’. सहा भाषांमध्ये भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर २०२३मध्ये प्रदर्शित होईल.” असे कॅप्शन दिले आहे.
जितेंद्र आव्हाड प्रस्तुत शाहू छत्रपती या चित्रपटातून महाराष्ट्र आणि देशाच्या इतिहासातील एक मानाचं आणि अभिमानंच स्थान असलेल्या लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्यांच दर्शन घडणार आहे. या चित्रपटाची कथा डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिली असून दिग्दर्शन वरुण सुखराजने केलं आहे.विद्रोह फिल्म्स निर्मित हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.