घर महाराष्ट्र राजकारण हा फसवाफसवीचा उद्योग बनला आहे, ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

राजकारण हा फसवाफसवीचा उद्योग बनला आहे, ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र सरकारने उद्योगपती रतन टाटा यांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव केला. ग्राहकांची पहिली पसंती ही टाटांच्या उत्पादनांनाच असते. कारण टाटांच्या निष्ठा कधी बदलल्या नाहीत. मात्र देशाच्या राजकारणाची सध्या काय अवस्था आहे? आज राजकारण हा फसवाफसवीचा उद्योग बनला आहे. टाटांच्या उद्योगांवर कधी छापे पडले नाहीत, पण टाटांना ज्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्या महानुभावांच्या उद्योगांवर छापे पडत असल्याने विश्वासाची ऐशी की तैशी करून या सगळ्यांनी पक्षांतर केले व टाटांना पुरस्कार देण्यासाठी पुढे आले, असा हल्लाबोल ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : “शरद पवारांच्या नावावर…” अजित पवार गटाला संजय राऊतांनी सुनावले

- Advertisement -

विश्वासराव पानिपतात मारले गेले किंवा हरवले यावर इतिहास आजही चिवडला जातोय. मात्र देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणातून विश्वास संपला आहे. राजकारण हे खोटेपणाच्या व अविश्वासाच्या पायावर उभे आहे. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच रोज खोटे बोलत आहेत. अशा खोटेपणाच्या वातावरणात हा पुरस्कार मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रदान केला व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार वगैरे लोक त्या सोहळ्यास उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘टाटा म्हणजे ट्रस्ट. टाटा म्हणजे विश्वास.’’ पण, अशा विश्वासपात्र व्यक्तीला पुरस्कार देणाऱ्यांनी ‘विश्वास’ शब्दाची हत्याच केली, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

‘विश्वास’ शब्दाची विल्हेवाट लावली

अजित पवार, शिंदे, केसरकर, उद्योगमंत्री सामंत यांनी ‘विश्वास’ शब्दाची विल्हेवाट लावली व ते टाटांच्या निमित्ताने ‘ट्रस्ट’, ‘विश्वास’ अशा शब्दांची महती गात आहेत. टाटा म्हणजे ट्रस्ट. मग ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्यांची टाटांना पुरस्कार प्रदान करण्याची योग्यता खरोखरच आहे काय? असा खोचक सवाल ठाकरे गटाने केला आहे.

त्रिकूट विश्वासास पात्र नाही

- Advertisement -

टाटा म्हणजे विश्वास हे सांगणाऱ्यांनी जनमानसातून विश्वास गमावला आहे. पवार, शिंदे, फडणवीस हे लोकांच्या विश्वासास पात्र राहिलेले नेतृत्व नाही. अविश्वासाचे जुगाड करून सत्तेवर आलेले हे त्रिकुट आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

‘आधी राष्ट्र, मग नफा’ हा टाटांचा मंत्र

टाटा यांचे राष्ट्र उभारणीत योगदान मोठे आहे. मिठापासून विमानांपर्यंतच्या उद्योगांत टाटा आहेत. टाटांनी महाराष्ट्रास कर्मभूमी मानले व उद्योगाचा विस्तार देशात केला. भारतीय उद्योगांचा पाया टाटांनी घातला तो विश्वासाच्या बळावर. देश लुटून व राजकारण्यांची हाजी हाजी करून त्यांनी आपले उद्योग साम्राज्य वाढवले नाही. ‘आधी राष्ट्र, मग नफा’ हा त्यांचा मंत्र. त्यामुळे इतर उद्योगांप्रमाणे चारसोबिसी करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही, असा टोला या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

हेही वाचा – ईशान्य मुंबईतून निवडणूक लढविण्याबाबत संजय राऊतांचे स्पष्टीकरण, म्हणाले…

‘पीएम केअर्स फंडा’त टाटांचे मोठे योगदान

टाटा यांचे मुंबई-महाराष्ट्राशी एक भावनिक नाते आहे. टाटांच्या पूर्वजांनी मुंबईत अनेक सामाजिक, वैद्यकीय संस्था उभ्या केल्या. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात टाटांनी सढळ हस्ते मदत केली. कोरोना काळात ‘पीएम केअर्स फंडा’त टाटांनी मोठे योगदान दिले व त्या योगदानाचा हिशेब काही समोर आला नाही, याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राची घसरण

टाटा यांनी मुंबई-महाराष्ट्रात उद्योग उभे केले. महाराष्ट्राच्या आर्थिक उलाढालीत टाटांचे योगदान मोलाचे आहे व कोणी दबाव आणला म्हणून टाटांनी त्यांचे उद्योग गुंडाळून गुजरातेत हलवले नाहीत. ‘उद्योगरत्न’ म्हणून टाटांचा गौरव करताना महाराष्ट्राच्या घसरत चाललेल्या औद्योगिक क्षेत्राची चिंता शिंदे-पवार-फडणवीस सरकारला आहे काय? महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या कमजोर, खिळखिळा करण्याचा उद्योग केंद्राने चालवला आहे. महाराष्ट्रातील अनेक उद्योग, आर्थिक उलाढालींची केंद्रे गुजरातेत खेचून नेली जात आहेत. महाराष्ट्राचे ग्रामीण अर्थकारण व सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे उपद्व्याप सुरू आहेत. महाराष्ट्राची लूट सुरू आहे व त्या लुटीस हातभार लावणाऱ्यांच्या हातून टाटांना उद्योगरत्न पुरस्कार देण्यात आला, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

पुरस्कार देणाऱ्यांचे काय?

रतन टाटा हे जगाच्या खोट्या दिखाव्यांवर विश्वास ठेवत नाहीत. ते साधे राहतात. उच्च विचारांचे ते शालीन व्यक्तिमत्त्व आहे. रतन टाटा म्हणतात की, ‘‘व्यवसायाचा अर्थ नफा मिळवणे नव्हे, तर समाजाबद्दल असलेली आपली जबाबदारी समजून घेणे होय.’’ ही बांधिलकी टाटा आजही जपत आहेत. त्यांना उद्योगात चोऱ्या करून नफा नकोय, पण त्यांना पुरस्कार देणाऱ्यांचे काय? त्यांचे हात चोऱ्या-लुटमारीत गुंतल्याने त्यांनी विश्वास नष्ट करून पक्षांतरे केली. सत्ता हा चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या बदमाशांचा अखेरचा अड्डा बनला आहे. अशा लोकांकडून रतन टाटांसारख्या विश्वासपात्र लोकांना पुरस्कार स्वीकारावा लागतो हे दुर्दैवच म्हणावे लागेल, अशी खंत ठाकरे गटाने व्यक्त केली आहे.

- Advertisment -