राज्यातील 10 दिवसाच्या राजकीय नाट्य संपत असताना सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचे म्हटले तर काहींनी केंद्रीय नेत्यांचे तसे आदेशच असल्याचे तर्क लावले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना अपमानित करण्यासाठीच त्यांना मुख्यमंत्री पद न देता उपमुख्यमंत्री पद दिल्याचे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि 40 आमदारांना घेऊन आलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यामुळे राजकीय नाट्य संपल्यानंतरही राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची देहबोली आणि पडलेला चेहरा पाहून त्यांच्या मनाविरुध्द झाल्याचेही सांगितले पण पक्षाचे आदेश त्यांनी पाळले याचे कौतुकही केले. पण प्रकाश आंबेडकर यांनी हे फडणवीस यांना अपमानित कऱण्याच्या हेतून झाल्याचे सांगितले.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा केली. यानंतर या मंत्रीमंडळाचा आपण कोणताच भाग राहणार नसल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र, केंद्रीय नेतृत्वाचे आदेश येताच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावरुन तर्क-वितर्क लावले जात असतानाच आता प्रकाश आंबेडकर यांनी हे फडणवीसांना अपमानित करण्यासाठी उचललेले पाऊल असल्याचे सांगितले आहे.