मुंबई : लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे आहे. परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजपा युतीला झाला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत 48 लाख मतदार अधिक वाढले आहेत. विशेष म्हणजे 2019 लोकसभा निवडणूक ते 2024 ची लोकसभा निवडणूक या पाच वर्षात 32 लाख मतदार वाढले, तर मग अवघ्या सहा महिन्यांत 48 लाख मतदार कसे वाढले याचे उत्तर निवडणूक आयोगाने पुराव्यासह द्यावे, अशी मागणी प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी केली आहे. (Praveen Chakraborty demands proof of how 48 lakh voters increased in just six months)
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून काँग्रेस पक्षाने आज राज्यभर लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन केले आणि त्यानंतर पत्रकार परिषदा घेतल्या. मुंबईत गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला प्रोफेशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी खासदार कुमार केतकर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांना संबोधित करताना प्रवीण चक्रवर्ती म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या 9.7 कोटी असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे, पण मोदी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील 18 वर्षांवरील प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी आहे. या आकडेवारीनुसार 16 लाख मतदारसंख्या वाढली कशी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा – Prithviraj Chavan : निवडणूक आयोगाने वाढवलेल्या मतदारांमुळे महायुतीचा विजय, चव्हाण यांचा आरोप
प्रवीण चक्रवर्ती म्हणाले की, मतदार याद्या नोंदणीमध्ये अनेक घोळ करण्यात आले आहेत. शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात एकाच पत्त्यावर 5 हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली. या मतदारांकडे काँग्रेस उमेदवार प्रतिभा घोगरे यांनी ओळखपत्र, रहिवाशी दाखल्याची विचारणा केली असता ते स्थानिक रहिवाशी नसल्याचे उघड झाले. निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली असता त्यावर अद्याप उत्तर मिळाले नाही.
निवडणूक आयोगाने या ‘व्होटर डे’ ला ‘चिटर डे’ केले
दरम्यान, प्रवीण चक्रवर्ती म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर 132 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 20 ते 25 हजार नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. लोकसभेला यातील 62 विधानसभा मतदारसंघात महायुती आघाडीवर होती, पण विधानसभेला याच 132 मतदारसंघातून 112 जागी महायुतीचा विजय झाला, हे महत्त्वाचे आहे. मतदार याद्यांमधील भरमसाठ वाढ अनाकलनीय व संशयास्पद आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे माहिती मागितली असता त्यांनी अद्याप दिलेली नाही. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे. त्यांनी सर्व डेटा सार्वजनिक करावा ही काँग्रेसची मागणी आहे. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे, पण निवडणूक आयोगाने या ‘व्होटर डे’ ला ‘चिटर डे’ केले आहे, असे म्हणत प्रवीण चक्रवर्ती निवडणूक आयोगाची खिल्ली उडवली.
हेही वाचा – Yashomati Thakur : अमरावतीत त्रिशूळच्या नावाने गुप्ती वाटप; यशोमती ठाकूर खासदार बोंडेंमध्ये जुंपली