राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक महिन्याभरापासून आरोप करुन चर्चेत राहण्याचे काम करत आहेत. मलिक स्वतःच तपास यंत्रणा झाले असल्यासारखे वागत असल्याचा घणाघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. मलिकांनी भाजप नेते अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. यामध्ये भाजपशासित राज्यात दंगल होत नाही परंतु भाजपचे सरकार नसलेल्या राज्यांत दंगल होते असं अनिल बोंडे म्हणाले आहेत. यावरुनही प्रवीण दरेकर यांनी मलिकांवर घणाघात केला आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांवर हल्लाबोल केला आहे. नवाब मलिकच आता स्वतंत्र तपास यंत्रणा झाले आहेत. माहिती केंद्र झाले आहेत. त्यांना जर अशा प्रकारचा हात वाटत असेल तर गृहखाते तपास करत आहेत. न्यायव्यवस्था, तपास यंत्रणांकडे नवाब मलिकांनी तक्रार करावी, परंतु नवाब मलिकांना तक्रार करणे, त्यातून दोषींवर कारवाई करणे यापेक्षा चर्चा आणि आरोप करुन सनसनाटी निर्माण करण्याचा गेल्या महिन्यापासूनचा दिनक्रम सुरु आहे. जर हे खरं असेल भाजपशासित राज्यात दंगल नाही बाकी ठिकाणी होते याच्यामध्ये काय चुकीचे आहे. याचा विचार केला पाहिजे की अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नये यासाठी राज्य आणि केंद्रामध्ये संवाद ठेवला पाहिजे असे दरेकर यांनी म्हटलं आहे.
परमबीर सिंह फरार आहेत तर त्यांना आज उद्या यावे लागेल कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. त्यामुळे खरं खोटं समोर येईल. त्यांची चूक असेल तर परमबीर सिंहांना आम्ही पाठीशी घालणार नाही. कायद्यासमोर परमबीर सिंह काय, गृहमंत्री काय किंवा सर्वसामान्य नागरिक सर्व समान आहेत असे प्रवीण दरेकर म्हणाले.
मीडियाच्या माध्यमातून खळबळजनक आरोप करत चर्चेत राहणं हा नवाब मलिकांचा गेल्या महिन्याभराचा दिनक्रम! @nawabmalikncp pic.twitter.com/8cQsrWqvWs
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) November 18, 2021
अनिल देशमुखांना भाजपच्या मदतीने अडकवले
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी खंडणीचे खोटे आरोप करुन अडकवले आहे. परमबीर सिंह यांनी यासाठी भाजपची मदत घेतली आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी राज्य सरकारला अंधारात ठेऊन गैर कृत्ये केली आहेत. ही सर्व समोर येणार आल्यावर आपल्याला अटक होणार हे त्यांना माहिती होते त्यामुळे त्यांनी भाजपच्या मदतीने अनिल देशमुख यांना अटकवण्याचा कट रचला आहे. असे आमचं स्पष्ट मत असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा : नाना पटोलेंनी घेतली फडणवीसांची भेट; विधान परिषदेची पोटनिवडणूक होणार बिनविरोध?