नुकतंच प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. अशातच सरकारकडून रातोरात या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले. त्यांनतर मागील अनेक वर्षांपासून शिवप्रेमींकडून एक मागणी करण्यात येत होती त्या मागणीवर आता सरकारने कार्यवाही केली आहे. अफझलखानाच्या कबरीजवळील बेकायदेशीर बांधकामावर सरकारने बुलडोझर फिरवला. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे शिवप्रेमींकडून स्वागत करण्यात आले.
अशातच आता पर्यटन विभागाकडून प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज हे अफझल खानाचा कोथळा काढतानाचा आणि त्याला ठार करतानाचा पुतळा आणि लाईट, साऊंड शो सुरू करण्यासंदर्भात विचार करत आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या संदर्भात सचिवांना पत्र पाठवून याबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. या पत्रात म्हटल्या प्रमाणे, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण जगाला परिचित आहे. प्रतापगडावर झालेल्या शिवाजी महाराज आणि अफझल खान भेटीत महाराजांनी वाघनखांदचा मारा करत अफझल खानाला ठार मारून हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूचा अंत केला. या प्रसंगाची इतिहासात महत्वपूर्ण नोंद आहे.
शिवभक्तांच्या मागणीला लक्षात घेऊन, किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट व साउंड शो सुरु करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव मागविण्यात आला आहे!#shivpratap #छत्रपतीशिवाजीमहाराज #प्रतापगड pic.twitter.com/SyR0v23av3
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) November 15, 2022
आजही शिवभक्तांना या घटनेतून प्रेरणा मिळते. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज अफझल खानाचा वध काढतानाचा पुतळा शिवप्रताप स्मारक उभारण्यासाठी तसेच लाईट-साऊंड शो सुरू करण्याबाबत हिंदू एकता आंदोलन, सातारा व इतर संघटनांकडून विनंती करण्यात आली होती. त्यावर संबधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तातडीने प्रस्ताव मागवण्यात यावा असे आदेश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सचिवांना दिले आहेत.
जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना पोलीस बंदोबस्त
नुकतंच प्रतापगडच्या पायथ्याला असलेल्या अफझल खानाच्या कबरी भोवतालची अतिक्रमणे पोलिसांनी एका रात्रीत हटविली. त्यानंतर जिल्ह्यात अनुचित प्रकार घडून येऊ नयेत म्हणून जिल्ह्यातील सर्व प्रार्थना स्थळांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतापगड परिसरात जमावबंदी म्हणजेच १४४ कलम लागू करण्यात आले होते. त्याचसोबत जिल्ह्यातील मंदिरे, मस्जिद परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हे ही वाचा – या सगळ्या राजकारणात ‘शकुनी’ कोण? जितेंद्र आव्हाडांचा सवाल