औरंगाबाद – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ठिकठिकाणी शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. शिंदेच्या बंडाला औरंगाबादेत मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यामळे औरंगाबादेत या दोन्ही गटांमध्ये शीतयुद्ध रंगलेलं असतं. त्यातच, नागरिकांना आपल्याकडे वळवून घेण्याकरता दोन्ही गटांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याकरता ठाकरे गटाकडून रामकथेचे आयोजन तर, शिंदे गटाकडून हळदीकुंक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही गटांमध्ये प्रतिष्ठेची अघोषित लढाई सुरू आहे, असं राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.
औरंगाबाद येथे आमदार संजय शिरसाट यांच्या पश्चिम मतदारसंघातील महत्त्वाच्या आणि शहरालगतच्या बजानगर भागात दोन्ही गटांकडून कुरघोडी केली जातेय. ठाकरे गटाकडून बजाजनगर परिसरात भव्य रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २५ जानेवारी दरम्यान ह.भ.प.रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांच्याकडून या रामकथेचे पठण होत आहे. ठाकरे गटाकडून या कार्यक्रमाचे निमंत्रण घरोघरी वाटण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनीही या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद दिला आहे.
ठाकरे गटाला शह देण्याकरता शिंदे गटही पुढे सरसावला आहे. त्यांच्याकडून महिलांसाठी हळदीकुंकूचे कार्यक्रम घेण्यात आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमालाही महिलांची तुफान गर्दी झाली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला खिंडार पडले आहे. अनेक नेते, आमदार, खासदार शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाला आता पुन्हा नव्याने उभं राहावं लागणार आहे. याकरता ठाकरे गटाकडून मेळावे, सभा, शिवसंवाद यात्रा, महाप्रबोधन यात्रा काढली जात आहे. तर, शिंदे गटाकडून स्थानिक कार्यक्रम घेऊन संघटन मजबूत केले जात आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणुकांमध्ये ही लढाई अधिक प्रतिष्ठेची होणार आहे.