मुंबई : राज्यातील शैक्षणिक वर्ष २०२२-२३मध्ये होणार्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार १ ते १४ मेदरम्यान ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करता येईल, तर १७ मेपासून प्रत्यक्ष अर्ज भरणे आणि अर्ज पडताळणीची कार्यवाही करण्यात येईल. माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी अकरावीच्या आगामी प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचना परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या आहेत.
परिपत्रकात नमूद केल्यानुसार प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेर्या, एक विशेष फेरी होईल, तर प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य फेरीऐवजी प्रतीक्षा यादी करण्याचे नियोजन आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी २३ मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरू राहील. प्रवेश प्रक्रियेची माहिती https://11thadmission.org.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी तातडीने सुरू करावी. प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन त्यानुसार नियोजन करावे. पालक-विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्ग, शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करावे. विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याबाबत संबंधित यंत्रणेस विनंती करावी, अशा सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केल्या आहेत.
सोयीस्कर प्रक्रिया
राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक या महापालिका क्षेत्रांत अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येते. दहावीच्या निकालानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहते, मात्र पुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये निकाल जाहीर होण्यापूर्वी १७ मेपर्यंत प्रवेश अर्जाचा भाग १ भरता येईल. त्यामुळे निकाल जाहीर होईपर्यंत कागदपत्र पडताळणी होईल, तर निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग 2 भरून महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे, गुणवत्ता यादी जाहीर करणे, प्रत्यक्ष प्रवेश देणे आदी प्रक्रिया होईल.
निकाल वेळेवर लावणार – वर्षा गायकवाड
दहावी, बारावीचा निकाल वेळेवर लावण्याचा प्रयत्न करणार असून यासंदर्भात पुढील आठवड्यात एक बैठक होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.