राज्यातील विविध महाविद्यालयातील रिक्त प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, कोकण अशा अनेक ठिकाणी प्राध्यापक संघटनांनी आंदोलन केले. मात्र ही भरती प्रक्रिया गेली कित्येक वर्षे झालीच नाही. अशातच आज ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पहिल्या टप्प्यात तब्बल २०८८ रिक्त प्राध्यापक आणि प्राचार्य भरतीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलिंबत प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे ही माहिती जाहीर केली आहे. लवकरचं ही भरती प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.
मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आज प्राध्यापकांच्या पहिल्या टप्यातील 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्याला मान्यता देण्यात आली आहे.
— Uday Samant (@samant_uday) November 9, 2021
राज्यातील अनेक विद्यापीठे आणि विविध महाविद्यालयामध्ये सर्वाधित सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने राज्य सरकारला वेळोवेळी या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठीच्या सुचना केल्या होत्या. मात्र कोरोना महामारी आणि त्यानंतरची परिस्थिती पाहता भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. परंतु राज्यात आता कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने राज्य सरकारने प्राध्यापक भरती प्रक्रियेला हिरवा कंदील दिला आहे.
यामुळे पहिल्या टप्प्यात २०८८ प्राध्यापक आणि प्राचार्य पदं भरतीला मान्यता देण्यात आली आहे. राज्यात गेल्या अकरा वर्षांपासून प्राध्यापक भरती नियमितपणे झालेली नाही. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावे यासाठी मागील काही वर्षांपासून प्राध्यापक संघटना मागणी करत होत्या. सर्वाधिक पदे रिक्त असल्याने याचा परिणाम परीक्षा नियोजन आणि इतर शैक्षणिक उपक्रमांवर होत होता. मात्र उशीरा का होईना प्राध्यापक भरतीला मान्यता मिळाली आहे.