पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आज सकाळी पोलीस पोहोचले. यावेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध झाला. यादरम्यान पोलीस आणि स्थानिकांमध्ये झटापट झाली. तसेच काही नागरिकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पण एवढा विरोध करूनही आंबिल ओढा परिसरातील घरांवर बुलडोजर चढला आहे. सध्या ही कारवाई नेमकी कोणी केली असा सर्वात मोठा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. स्थानिकांच्या मते केदार असोसिएट्स बिल्डरच्या नोटिशीनंतर ही कारवाई केली जात आहे. मात्र आता केदार असोसिएट्स बिल्डरचे प्रताप निकम यांनी ही कारवाई पुणे महानगरपालिकेने केली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. परंतु पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याप्रकरणाशी पुणे महापालिकेचा संबंध नाही आहे, असे म्हणतं हात झटकले आहे. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
महापौर नक्की काय म्हणाले?
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘याप्रकरणाशी पुणे महानगरपालिकेचा संबंध नाही आहे. ९० टक्के स्थानिकांनी अॅग्रिमेंट दिले होते. त्यामुळे आता याप्रकरणात एसआरएने लक्ष घालण्याची गरज आहे.’
माजी महापौर काय म्हणाल्या?
भाजप आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, ‘बैठकीत पावसाळ्यात अशाप्रकारची कारवाई करायची नाही, असे ठरले होते. त्यामुळे आता ही कारवाई का केली आहे? असा सवाल प्रशासनाला केला आहे. मात्र त्यांच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नाही आहे. यामागचं नेमकं कारण शोधाव लागेल. दरम्यान जर सत्ताधारी भाजपने पावसाळ्यात कारवाई करू नये असं ठरवलं होते, तर ही कारवाी कशी झाली? त्यामुळे आता याप्रकरणी राज्य सरकारसोबत चर्चा करून प्रशासनावर कारवाई करण्याबाबत विचारणा करू.’
हेही वाचा – Pune Ambil Odha: आता आम्ही कुठे जायचे? चिमुरड्याचा आक्रोश