महाराष्ट्रात मास्कमुक्तीचा निर्णय जाहीर होताच आज पुणेकर जनतेलाही दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकारने कोरोना निर्बंध हटवत मास्कचा वापर ऐच्छिक केला आहे. तर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात हेल्मेट सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना मास्कमुक्तीसोबतच हेल्मेट सक्तीतून काहीसा दिलासा मिळत आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हा नवा आदेश जारी केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हेल्मेट घालणं बंधनकारक नसून, हेल्मेटसाठी प्रबोधन केलं जाईल असं राजेश देशमुख यांनी म्हटले आहे.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व सर्व शासकीय यंत्रणा, यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या दुचाकीचा वापर करणान्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना हेल्मेटचा वापर बंधनकारक केले होते. तसेच 4 वर्षांवरील सर्वांना हेल्मेट वापरणं सक्तीचे केले होते. शिवाय हेल्मेटसक्तीचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेशही दिले होते. मात्र या आदेशामुळे पुण्यात सर्वसामान्यांना हेल्मेट सक्ती केल्याचा समज निर्माण झाला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून आता हेल्मेट सक्ती नसल्याचे स्पष्ट झालेय. दरम्यान पुणेकरांनी या निर्णयाला अल्प प्रतिसाद दर्शवला. यातच आज जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आज पुण्यात हेल्मेटसक्ती नाही, मात्र हेल्मेटसाठी प्रबोधन करणार असल्याचे आज स्पष्ट केले आहे.
पुण्यात रस्ते अपघातामध्ये मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. यात हेल्मेटशिवाय गाडी चालवल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन दगावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कार चालकांच्या तुलनेत दुचाकी वाहन चालकांचा अपघात होऊन मृत्यू होण्याचा धोका सातपट वाढलाय. रस्ते अपघातात जीव गमावलेल्यापैकी 62 टक्के चालकांचा मृत्यू डोक्याला इजा झाल्यामुळे झालाय. हेल्मेटसक्तीमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता 80 टक्के आहे. त्यामुळे हेल्मेट सक्तीचा निर्णय हा नागरिकांच्या जीवाच्या दृष्टीने योग्य असल्याचे मत वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येतेय.