पुणे – पुण्यातील नवले पुलावर रविवारी भीषण अपघात घडला होता. तब्बल ४८ वाहनांनी एकमेंकाना धडक दिली. या अपघातात ट्रकचालक जबाबदार होता. तो घटनास्थळावरून फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मनिराम यादव असं या ट्रकचालकाचं नाव आहे.
नवले पुलावरून जाताना डिझेल वाचवण्याकरता मनिराम यादव यांनी उतारावरून येताना गाडी न्युट्रल केली. त्यावेळी ट्रकचे ब्रेक लागले नाहीत. त्यामुळे या ट्रकने तब्बल ४८ वाहनांना धडक दिली. या धडकेत ४० ते ५० जण जखमी झाले आहेत.
अपघात झाला तेव्हापासून ट्रकचालक फरार होता. त्यामुळे सिंहगड पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर चाकण येथील नानेकरवाडी येथून आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर ४० ते ४५ गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ आदळला. यामध्ये सुमारे 40 ते 50 जण जखमी झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते या अपघाताप्रकरणी चौकशी करत आहेत.
अपघातादरम्यान रस्त्यावर ऑइल सांडल्याने रस्ता अधिकच निसरडा झाल्यामुळे गाड्यांची संख्या अधिकाधिक वाढत गेली. या अपघातात जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. परंतु या अपघातामध्ये अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.