मुंबईः जशी विविध झाडे केवळ प्राणवायू उत्सर्जित करून पर्यावरणाचा समतोल राखतात, तसेच आम्हीही सरकारच्या माध्यमातून ‘महाराष्ट्राचा समतोल विकास साधण्याचा’ प्रयत्न करीत आहोत, अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी मुंबईकरांना दिली. मुंबईतील ‘द प्लान्ट फेस्टिवल’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
‘आय लव मुंबई’ च्या माध्यमातून लोअर परळ येथील फिनिक्स मॉल येथे हे १५०वे वृक्ष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सुनील देशपांडे, आयपीएस अधिकारी कैसर खालिद, मिकी मेहता आदी मान्यवरांच्यासह शेकडो मुंबईकर उपस्थित होते.
३० वर्षांपूर्वी या फेस्टिवलची संकल्पना नाना चुडासामा आणि योगेश शहा यांनी प्रत्यक्षात साकारली. आज ३० वर्षांपूर्वीची ही एक परंपरा शायना एनसी आणि योगेश शहा यांच्या कन्या श्रुती यांनी जपली आहे. आजच्या या पर्यावरण संवर्धन उपक्रमाला उपस्थित राहता आल्याचा आनंद आहे. ‘आय लव मुंबई’ च्या माध्यमातून ‘हरित मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई’चा संदेश देणारे हे प्रदर्शन मुंबईकरांसाठी महत्वाचे ठरेल, असा मला विश्वास वाटतो असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. १६ ते १९ दरम्यान हा फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये किचन गार्डन अँड प्लान्ट केअर, बोन्साय केअर, ॲलो वेरा, कॉम्पोस्टिंग आणि वेस्ट मॅनेजमेंट याबाबत विविध स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
दरम्यान, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कॉंग्रेस आमदार अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याचा ऑफर दिली आहे. काँग्रेसकडून लोकांच्या फार अपेक्षा राहिलेल्या नाहीत, त्यामुळे अशोकरावांनीही त्यांच्या भूमिकांचा पुनर्विचार करायला हरकत नाही, असे मंत्री राधाकृष्ष विखे- पाटील यांनी सांगितले.
अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. महाविकास आघाडीच्या आक्रोश मोर्चालाही चव्हाण यांनी दांडी मारली होती. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताला पुष्टी मिळाली होती.