मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 31 डिसेंबरपर्यंत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाला द्यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहे. यासाठी आता काहीच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरून विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते. ज्यानंतर राहुल नार्वेकर आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण हे सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरले. आमदार अपात्रता प्रकरणाचे फटाके फुटायला आणखी काही वेळ शिल्लक आहे, असे वक्तव्य विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी केल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु आता तर त्यांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्याबाबत महत्त्वाची टिप्पणी करत या प्रकरणाचा निकाल लागणार तरी काय? यासंदर्भातील संकेतच एक प्रकारे दिले आहेत. (Rahul Narwekar’s Important Comment on Shiv Sena MLA Disqualification Result)
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायमच मी संविधानातील घटनेला धरूनच काम करणार असे सांगितले आहे. लोकांना न्याय मिळाला पाहिजे. जेणेकरुन न्याय मिळाल्यानंतर ते आनंद व्यक्त करु शकतील. फटाके फुटायला आणखी काही वेळ शिल्लक आहे. लोकशाहीत बहुमत हे महत्त्वाचे असते. त्यामुळे सद्यपरिस्थितीत संविधानातील कायदे आणि नियमांचे पालन केले जाईल. जनतेला अपेक्षित असणारा आणि कायद्याला धरुन असणारा निकाल दिला जाईल, असेही नार्वेकरांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, आता त्यांनी लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते, अशी टिप्पणी केली आहे. ज्यामुळे एक प्रकारे त्यांनी शिंदे गटाच्याच बाजूने निकाल लागणार असल्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा कोणत्याही निकालात बहुमत महत्त्वाचे असल्याचे वक्तव्य अनेकदा केले आहे. कारण सध्या शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे गटाकडे बहुमत आहे आणि याच बहुमताटच्या जोरावर केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील शिंदेंचा गट हा खरी शिवसेना असल्याचे सांगितले होते. तर, फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या, ‘शिंदे गट हाच शिवसेना पक्ष असल्याच्या’ निकालाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते की, लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते, हे या निकालाने सिद्ध केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा मेरिटवर आधारित आहे, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता स्वतः विधानसभा अध्यक्षांनी बहुमताबाबत केलेले वक्तव्य हे एक प्रकारचे निकालाबाबत दिलेले संकेतच असल्याचे बोलले जात आहे.
सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशानंतर राहुल नार्वेकर हे सुद्धा अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत. विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता प्रकरणाची पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे आता बहुमताचे वक्तव्य करून राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल काय लागणार, याचे संकेतच एकप्रकारे दिले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.