मुंबई, ठाणे, उपनगरांना मागील २ दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले आहे. संपुर्ण महाराष्ट्राने मान्सूनने व्यापले आहे. शुक्रवारी दुपारपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पावसाने वेग धरला आहे. मुंबईत गेल्या ३ ते ४ तासांपासून सलग पाऊस पडत आहे. तर राज्यातील काही भागात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पुढील ५ दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट करण्यात आले आहे. या पाच दिवसांत मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याची तीव्रता वाढण्याचे पुर्वानुमान आणि त्याचबरोबर त्याचा पश्चिमेकडचा प्रवास हे गृहित धरुन पश्चिम किनारपट्टी म्हणजेच कोकणाकडे पुढील ४ ते ५ दिवस अती तिव्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम किनारपट्टीच्या भागात जोरदार वाऱ्यांसह पाऊस असेल याचा परिणाम मुंबई,ठाणे,पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
येत्या 5 दिवसात कोकण मध्ये अत्यंत तीव्र मुसळधार पावसाची शक्यता.
काळजी घ्या
रेड इशारा आज रत्नागिरी, रायगड साठी
रविवारी, मुंबई ठाणे, रायगड, रत्नागिरी…
IMD ची वेबसाइट पहा
-IMD pic.twitter.com/14gLn1r9gV— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2021
रत्नागिरी आणि रायगडला पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्याला रविवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. पावसाची तीव्रता पुढील २ ते ३ दिवसांत रोज वाढताना दिसणार आहे. यामुळे मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो काळजी घ्या तसेच गरज असले तर घराबाहेर पडा असा इशारा देण्यात आला आहे. विकेंडला घराबाहेर न पडता घरातरच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे,सातारा,कोल्हापूर या जिल्हांना हाय अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मराठवाडा नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.