पावसाळी वातावरण निवळेल असा आशावाद निर्माण झालेला असताना आणि भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा एकदा बळीराजाला चिंतेत टाकणारा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढच्या २४ तासांत काही ठिकाणी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळे आधीच झालेल्या अवकाळीने दिवस-रात्र एक करत पिकवलेली पिके भुईसपाट झाल्यानं चिंतेत असलेल्या बळीराजासमोर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट आ वासून उभं राहिलंय.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याने राज्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात तर काल विजांसह पाऊस झाला आहे. पण पुढील २४ तासांत कोकणात पुन्हा पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मराठवाड्यातील काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अधीच अडचणीत सापडलेला शेतकरी आणखी संकटात जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी संपतच नाही.
गेल्या आठवड्यात आणि या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे हवामानात बदल होण्यापूर्वीच अचानक उष्णता वाढत आहे. बुधवारी सकाळपर्यंत चंद्रपूर येथे राज्यतील उच्चांकी 35.8 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान २९ ते ३५ अंशांच्या दरम्यान होतं. तर किमान तापमानाचा पारा बहुतांश ठिकाणी १३ अंशांच्या पुढे कायम आहे.