गेल्या २४ तासांपासून राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. हरयाणा, दिल्ली, मध्य महाराष्ट्र, उत्तराखंड, राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगढ, विदर्भ, गुजरात, तामिळनाडू, पद्दुचेरी, केरळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत राजस्थान, हरयाणा, पंजाब आणि गुजरातच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा चारपट जास्त पाऊस झाला आहे. भारतीय मौसम विज्ञान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी काही राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी केला आहे. आयएमडीनुसार पुढील काही दिवसांमध्ये दिल्ली-एनसीआर, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र आणि ओडिसाच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
देशातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता
पुढील पाच दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगढ, ओडिसामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये आणि पूर्व क्षेत्रातील काही भागांमध्ये ढगाच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मंगळवारी उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील या भागांमध्ये पावसाचा जोर कायम
आयएमडीने रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, वर्धा, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढील तीन ते चार दिवस मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पावसाचा जोर राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
पुढील काही दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र दाबामध्ये बदलून उत्तर-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. रविवारपासून मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात आणखीन मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा – ठाण्यात २५ विसर्जन स्थळी १,१९२ नागरिकांची अँटीजन चाचणी; एक जण पॉझिटिव्ह