मुंबई – सगळीकडे नवरात्रौत्सवाचा उत्साह असताना गरब्यावर पावसाचं विरजण पडण्याची शक्यता आहे. बुधवारी मुंबईसह आजूबाजूच्या परिसारत हलक्या सरी बरसल्या. मात्र, पुढील तीन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
परतीचा पाऊस राजस्थानात दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही लवकरच परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. ५ ऑक्टोबर रोजी परतीचा पाऊस महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या पावसाचा वेग कमी असल्याने उशीरही होऊ शकतो, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.
हेही वाचा – मेट्रो कारशेडच्या आरक्षणावरून स्थानिक विरूद्ध सरकार
आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच, उद्या शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर शनिवारीही पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
दरम्यान, सध्या सगळीकडे गरब्याचा उत्साह आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा गरबा-दांडिया खेळायला परवानगी दिल्याने अबालवृद्धांसह सारेचजण मनमुराद आनंद लुटत आहेत. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसांपासून गरबा आणि दांडिया खेळाला उत्साह आला आहे. मात्र, आता पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने दांडिया रसिकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे गरब्यावर पावसाचं संकट आहे.