मुंबई : जुलै महिन्यात पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये थैमान घातले होते. जोरदार झालेल्या पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि NDRF च्या पथकांमार्फत पुरस्थिती निर्माण झालेल्या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून याची नुकसान भरपाई शासनाने लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. जुलै महिन्यात थैमान घातलेल्या पावसाने ऑगस्टच्या महिन्याच्या सुरुवातीपासूनच उघडीप घेतली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उष्णतेच्या झळा बसण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. परंतु हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा राज्यातील अनेत भागांत पावसाचे पुनरागमन होणार आहे. (Rain will return in the state, Information from Meteorological Department)
हेही वाचा – अनेक महिन्यांनंतर मुंबईत कोरोना रुग्णाचा मृत्यू; डॉक्टरांनी काय दिली माहिती?
येत्या 13 ऑगस्टपासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे कोकणात आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. कोकणात अनेक भागांमध्ये मुसळधार तर विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. तर 15 ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस पडणार आहे. त्यामुळे मान्सूनच्या नवीन पद्धतीनुसार राज्यात कमी वेळेत अधिक पाऊस पडणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तर यंदाच्या मान्सूनवर एल निनो या वादळाचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडत आहे, असेही हवामान खात्याकडून याआधीच सांगण्यात आले आहे.
हवामान खात्याने पावसाची पुन्हा एकदा आनंद वार्ता दिल्याने नागरिकांना पावसाची आतुरता लागली आहे. तर मागील महिन्यात मुंबईत पावसाने धुमाकूळ घातला होता. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले होते. तर वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली होती. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्याने नागरिक गर्मीने हैराण झाले आहेत. तर हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, 04 ऑगस्टपर्यंत राज्यात तूरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, 04 ऑगस्टपासून तर 09 ऑगस्टपर्यंत बहुतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे.