एकीकडे उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली असलेली असतानाच आता १० ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. १० ते १८ दरम्यान हे अधिवेशन होणार असल्याचे समजते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोली आणि नाशिकच्या दौऱ्यावर होते. मात्र, हा दौरा रद्द करून तातडीने बैठक बोलावण्यात आली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री निवासस्थान नंदनवनमध्ये दाखल. त्यांच्यात बैठक नुकतीच संपली असून ते आता राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत पावसाळी अधिवेशन घेण्याची गरज असून १२ तारखेची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची टांगती तलवार असल्याने मंत्रिमंडळाचा लहान विस्तार होणार असल्याची शक्यता आहे. भाजपकडून ८ सदस्य तर, शिवसेनेचे ७ सदस्य शपथ घेणार आहेत. तसेच, अपक्ष समर्थक आमदारांचा अधिवेशननंतर विस्तारात समावेश करणार आहेत. दुसरीकडे विधिमंडळात सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली असल्याचं म्हटलं जात आहे.
शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून दीड महिना उलटत आला आहे. मात्र, तरीही ना मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि नाही पावसाळी अधिवेशन. मात्र, शिंदे फडणवीस सरकारने आता कामाला वेग धरला असून येत्या २४ तासांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. तर, १० ते १८ ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशन होणार आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून राज्यात अवघ्या दोन जणांचे सरकार राज्य चालवत आहेत. गेल्या दीड महिन्यात सातशेहून अधिक जीआर मान्य करण्यात आले आहेत. तर, महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णय रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री सतत दिल्ली दौऱ्यावर जातात आणि उपमुख्यमंत्री राज्य कारभार हाकत असल्याची टीका केली जातेय. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून काय रणनीती आखण्यात येतेय हे पाहावं लागेल.
पाचच दिवस चालेल कामकाज?
दोन आठवडे हे अधिवेशन चालवले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या काळात मोजून पाच दिवस कामकाज चालण्याची शक्यता आहे. १० ते १३ ऑगस्टदरम्यान सलग कामकाज चालेल. मात्र, त्यानंतर १४ ऑगस्टला रविवार, १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन, १६ ऑगस्टला पारशी नुतनवर्ष असे सलग तीन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे या काळात अधिवेशन चालणार नाही. त्यानंतर १७ आणि १८ ऑगस्टला कामकाज होईल.