मुंबईः मुंबईच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च सुरु आहे. दिवे लावले जात आहेत. रात्रीच्या वेळेस मुंबई आहे की डान्स बार आहे हेच कळत नाही, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाणला.
राज ठाकरे म्हणाले, जगभरात कसे सुशोभीकरण सुरु आहे ते बघ जरा एकदा. कशी स्वच्छता राखली जाते ते बघा जरा. आपल्याकडे काय तर लाईटी लावल्या जातात. त्या तेथे सिंहाच्या मागे लाईट लावली आहे. रात्रीच्या वेळेस ते कसं दिसतं. असं वाटतं की सिंहाला मुळव्याध झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी विकासकामांकडे लक्ष दिले पाहिजे. उद्धव ठाकरे जेथे सभा घेतात तेथे सभा घेऊ नका. अनेक प्रश्न आहे. कर्माचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा मुद्दा प्रलंबित आहे. तो आधी सोडवा. अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. बांधावर जा. त्यांचे दुःख जाणून घ्या. सभा कसल्या घेताय, असा टोला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाणला.
पुढे राज ठाकरे म्हणाले, न्यायालयावर अवलंबून असलेले सरकार मी पाहिलेले नाही. न्यायालयावर कसले अवलंबून राहताय. घेऊन टाका एकदा निवडणुका. काय व्हायचे ते होऊन जाऊ द्या एकदा. तुम्ही जो चिखल केला आहे ना तो चिखल तुमच्यावर कसा जनता फेकेल हे तुम्हाला कळेल.
मनसेचा गुढी पाडवा मेळावा बुधवारी शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही निशाणा साधला.