महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पावर यांच्यावर टीका करत आहेत. औरंगाबादेत झालेल्या सभेत राज ठाकरेंनी शरद पवारांवर चांगलाच हल्लाबोल केला. शिवाय राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत भाष्य करत 4 तारखेपासून संपुर्ण देशभरात मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला. सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा या विषयांवरुन मनसे आणि भाजापा विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. असं असतानाच आता शिवसेनेचे रत्नागिरीतील खासदार विनायक राऊत यांनी मनसेवर निशाणा साधला. “दर निवडणुकीला आपला पक्ष भाड्याने द्यायचा ही राज ठाकरेंची परंपरा मागील अनेक वर्षांपासून आहे”, असा टोला विनायक राऊतांनी लगावला आहे.
“दर निवडणुकीला आपला पक्ष भाड्याने द्यायचा ही राज ठाकरेंची परंपरा मागील अनेक वर्षांपासून आहे. आज सुद्धा भाजपाच्या तालावर नाचताना केवळ आणि केवळ बंधू द्वेष आहे. सख्खा भाऊ पक्का वैरी म्हटलं जातं तसं आहे हे. आपला भाऊ म्हणजेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी बसल्यानंतर आणि केवळ बसल्यानंतर नाही तर देशातील कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रशंसा झालेली आहे. आपला भाऊ मुख्यमंत्री पदी बसला हा द्वेष त्यांना सतावतोय. त्यामधून त्यांच्या मनात द्वेष निर्माण झालाय म्हणून उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी हा राज ठाकरेंचा थयथयाट सुरु आहे” असा टोला विनायक राऊत यांनी लगावला.
“राज ठाकरे यांनी शरद पवारांसारख्या देशातल्या एका आदरणीय व्यक्तीचा अपमान केला. त्याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. बारामतीमध्ये नव्हते तर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये शरद पवारांबद्दल असणारा आदर आणि कर्तृत्व याची बरोबरी कोणी करुच शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शरद पवार हे माझे राजकारणातील गुरु असल्याचा आदराने उल्लेख केलाय. असं असताना काल आलेल्या राज ठाकरेंनी ज्यापद्दतीने शरद पवारांचा अवमान केलाय ते पाहता महाराष्ट्रातील जनता या अपमानाचा बदला घेणार, राज ठाकरेंची जागा काय आहे हे त्यांना दाखवून देणार. तसेच, कायदा आणि सुव्यवस्था बघिडवण्याचा डाव मनसे आणि भाजपाचा आहे. पण त्याला महाराष्ट्रची जनता भीक घालणार नाही”, असं विनायक राऊत यांनी म्हटलं.
त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी आता स्वतंत्र युद्धात देखील आपला सहभाग जाहीर करावा अशी उपरोधिक टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. बाबरीवरून फडणवीस यांनी केलेल्या विधानाला राऊत यांनी हे उत्तर दिले आहे. राज्यात कायद्याचे राज्य आहे. राणा यांनी उद्धव ठाकरे यांना काय शब्द वापरले आहेत हे पोलीसांनी पाहीलं आहे. त्यामुळे राणा प्रकरण कायद्याने हाताळलं जात आहे अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे.
हेही वाचा – मुस्लिम पत्रकार म्हणतात कुणी केली भोंग्यांची तक्रार; राज यांनी नाव जाहीर करावं