महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला असला तरी या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या सोहळ्यात उपस्थित असलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या श्री सदस्यांचा उष्माघात झाला. या कार्यक्रमात उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्या श्री सदस्यांचा आकडा १२ पर्यंत पोहोचला आहे. या घटनेवरून आता राज्याचं राजकारण तापलंय. विरोधकांनी राज्य शासनावर जोरदार टीका केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्यासह अरविंद सावंत आणि विनायक राऊत हे देखील एमजीएम रुग्णालयात पोहोचले. यापाठोपाठ दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आधी ट्वीट करून आणि नंतर प्रत्यक्ष रूग्णालयात जाऊन रूग्णांची चौकशी केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान उष्माघाताचा तडाखा बसलेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी एमजीएम रूग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी रूग्णांच्या प्रकृतीची चौकशी करत मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी राज्य सरकारला अनेक सवाल उपस्थित केले.
हे ही वाचा: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मरण पावलेले श्रीसदस्य कोण आहेत?
हा सोहळा राजकीय हेतूने घेतला होता का? सोहळ्याला गालबोट लागलं ते टाळता आलं नसता का? इतक्या कडाक्याच्या उन्हात कार्यक्रम कशाला? वेळी संध्याकाळची घ्यावी कळलं नाही का? असे प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी यावरून राज्य सरकारला घेरलंय. तसंच उन्हामुळे वातावरण तापलेलं होतं. अशावेळी एव्हढ्या लोकांना इतक्या सकाळी कशाला बोलवायचं? त्यांना राजभवनावर बोलवून कार्यक्रम करता आला असता. झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. “कसं कुणाला जबाबदार धरावं काही कळत नाही.
कार्यक्रम संध्याकाळी केला असता तर हा प्रसंग टाळता आला असता”, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.राजकीय स्वार्थाशिवाय एवढ्या लोकांना बोलावलं जातं का? असा प्रतिसवाल करत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारला चांगलेच खडेबोल सुनावलेत.
हे ही वाचा: भाजपमध्ये कुणाला यायचं असेल तर त्यांचं स्वागत – चंद्रकांत बावनकुळे
सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी”, असा सल्ला देखील यावेळी राज ठाकरेंनी दिलाय.