मुंबई : भाजपाने महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांना पुढे पक्षात घेतले आणि त्यांना मंत्री केले, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधला. वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आज गुरुवारी (ता. 30 जानेवारी) मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक, त्यांना आलेली ईडीची नोटीस, भूमिका बदलण्यावरून त्यांच्यावर होणारी टीका तसेच विविध विषयांवर भाष्य केले. परंतु, भाजपाने ज्यांच्यावर आरोप केले, त्या सर्वांना पक्षात घेऊन मंत्रिपद दिले असे म्हणत राज ठाकरेंनी हल्ला चढवला. (Raj Thackeray targeted BJP on the issue of joining hands with corrupt Politians)
वरळी येथील मनसे मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, आम्ही डोक्यावर तलवारी घेऊन फिरत नाही. मोदी म्हणाले होते की, 70 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्याला आम्ही आत टाकू. मोदींच्या आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो, हे कळले. याबाबत मी तुम्हाला किती उदाहरणे देऊ. हिंमत बिस्वा शर्मा यांना भाजपाने भ्रष्टाचाराचे मुर्तीमंत प्रतिक असल्याची टीका भाजपाने केली होती, त्यांनाच भाजपाने पक्षात घेतले आणि त्यांना अर्थ, आरोग्य, शिक्षणाचे खाते दिले. त्यानंतर 2021 मध्ये मुख्यमंत्री केले. म्हणजे ज्यांच्यावर आरोप केले होते, तिथे भूमिका नाही बदलली. हे तुम्हाला कोणी नाही सांगणार. मुकूल रॉय हे घोटाळ्याचे शिल्पकार होते, असा आरोप भाजपाने केला होता. पण त्याच रॉय यांना भाजपाने पक्षात घेतले. त्यानंतर बी. एस. येडीयुरप्पा यांना खाण घोटाळ्याप्रकरणी भाजपाने त्यांना दूर केले. पण त्यानंतर भाजपा सत्तेत येत नाही, म्हणून त्यांना पुन्हा पक्षात घेतले आणि 2019 ते 2021 मध्ये त्यांना मुख्यमंत्री केले, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपाच्या भूमिकेची चिरफाड केली.
अजित पवारांविषयी तुम्हाला माहीत आहे. अशोक चव्हाण ज्यांचे आदर्श घोटाळ्यात नाव होते, त्यांच्यावर भाजपाने आरोप केले. त्यानंतर त्यांना आठ दिवसांमध्ये भाजपात घेण्यात आले, ज्यानंतर त्यांना थेट राज्यसभेत पाठवण्यात आले. इथे यांची भूमिका नाही बदलली, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला. काश्मीरमध्ये 370 कलमाला विरोध करणारे ओमर अब्दुल्ला आणि फारूक अब्दुल्ला यांनी भाजपासोबत युती केली. गेल्या 50-60 वर्षाचा इतिहास काय? कोणकोणत्या गोष्टी केल्या. मुफ्ती सईद आणि मेहबूब मुफ्ती यांच्याबरोबर देखील भाजपाने युती केली, त्यांना मुख्यमंत्री केले आणि मग सरकार पाडले. राधाकृष्ण विखे पाटील हे सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते, मंत्री होते मग भाजपामध्ये गेले. हर्षवर्धन पाटील, नारायण राणे हे देखील भाजपामध्ये गेले. किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले, असे म्हणत राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील भाजपावासी नेत्यांवर निशाणा साधला.