महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे गणेशोत्सवानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. त्यावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. त्यानंतर आता राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यातील विदर्भ दौऱ्यासाठी मनसेने खास मास्टरप्लॅन तयार केल्याचे समजते.
राज ठाकरे हे १३ सप्टेंबरला नागपूर जिल्हा दौऱ्यावर जाणार असून याठिकाणी ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहे. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पाऊल उचलली आहेत. त्यात राज ठाकरे यांनी मुंबई, पुणे, नाशिक प्रमाणेच आता विदर्भातही पक्षवाढीवर भर दिला आहे.
विदर्भात शिवसेनेचा मतदार हा सहजासहजी भाजपाला मतदान करणार नाही. या परिस्थितीत शिवसेनेवर नाराज असलेल्या मतदाराला मनसेकडे वळवण्याचा राज ठाकरेंना प्रयत्न आहे. त्याशिवाय, भाजापाचे अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे मनसे आण भाजपा युतीच्या चर्चाना राजकीय वर्तुळात उधाणा आले आहे.
सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते. त्यापूर्वीही फडणवीसांनी राज ठाकरेंनी भेट घेतली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.
दरम्यान, राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात भाजपाशी युती करत सरकार स्थापन केले. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटाचे आमदार एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत. दरम्यान, हेच सत्तांतर झाल्यानंतर एकीकडे शिवसेनेला गळती लागली. पण याच गळतीचा आता मनसेने फायदा घेत राज्यभरात पक्ष संघटना वाढीवर भर दिला आहे.
शिवसेनेची ही परिस्थिती पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा आणि अजेंडा दोन्ही बदलले. बाळासाहेब ठाकरे जयंतीच्यादिवशी मनसेने आक्रमक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेने शिवसेनेवर कुरघोडी केली.
हेही वाचा – मुंबईच्या रेल्वेस्थानकांवर अवतरणार ‘मेघदूत’, करणार हवेतून पाण्याची निर्मिती