राज्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. आतापर्यंत पूर परिस्थिती आणि दरड कोसळून अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सैनिकांनी त्यांना जमेल तितकी मदत लोकांना करावी असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने हाहाकार घातला आहे. आता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे यामुळे सर्व मनसैनिकांनी तात्काळ मदत करावी तसेच पूरपरिस्थिती ओसरल्यावर रोगराईचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यामुळे तातडीची मदत पोहचेल अशी व्यवस्था करण्याचे आवाहनही राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे.
राज ठाकरे यांनी एक प्रसिद्धी पत्रक ट्विट करत राज्यातील मनसैनिकांना आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या अवघड परिस्थितीत मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी असे आवाहन करतो. आत्ता लोकांचा जीव महत्वाचा आहे आणि नंतर जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोचेल असं पहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी. महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये. असे पत्रक राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलं आहे.
महाराष्ट्र सैनिकांना आवाहन… pic.twitter.com/JiT5I13l4Q
— Raj Thackeray (@RajThackeray) July 23, 2021