शरद पवार यांनी जातीपातीच राजकारण केलयं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच राज्यात जातीच राजकारण सुरु झालं. असे एकामागोमाग एक घणाघात करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज औरंगाबादची सभा गाजवली. राज यांनी या सभेत पवार यांना प्रामुख्याने लक्ष्य केलं. पवार यांना हिंदू या शब्दाचीच एलर्जी आहे. प्रत्येक वेळी भाषणात बोलताना ते शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेतात. महाराष्ट्र हा शाहू, फुले आणि आंबेडकरांचा आहेच. पण त्याआधी महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर हे शिवाजी महाराजांचाच विचार घेऊन पुढे गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत शिवाजी महाराजांचा फोटो नसतो. आता मी बोलल्यानंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर छत्रपतींची प्रतिमा दिसायला लागली. मी जात मानत नाही. मला जातीशी देणेघेणे नाही. मी याठिकाणी ब्राह्मणांची बाजू घेण्यासाठी उभा नाही, असे ठणकावून सांगत राज ठाकरेंनी पवार हे नास्तिक असल्याचा आरोप केला .
तसेच पवार हे नास्तिक असल्याचे त्यांच्या कन्येनेच लोकसभेत सांगितल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. तसेच आपल्या भाषणात राज यांनी पवार सध्या रामायण ऐकत आहेत. देवाचे फोटो काढत आहेत या मुद्द्यावरही भाष्य केले. तसेच यावेळी राज यांनी जेम्स लेन यांच्या मुलाखतीचा दाखला दिला. त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरेना वृद्धापळात ते ब्राम्हण असल्यानेच पवारांनी त्रास दिल्याचा गंभीर आरोप यावेळी राज यांनी केला.