नाशिक : नाशिक जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर स्वाभिमानी शेतकरी संघटना बिर्हाड मोर्चा काढणार आहे. मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत.
नाशिक जिल्हा बँकेच्या वसुली विरोधात 16 जानेवारीला पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानावर भव्य बिर्हाड मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासोबतच मोर्चात सहभागी होणार्या शेतकर्यांना देखील आवाहन केले आहे. केवळ सहभागी व्हायचे म्हणून होऊ नका तर जोपर्यंत या विषयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार करा असे आवाहन राजू शेट्टी यांच्याकडून करण्यात आले आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात जिल्हा बँकेचे एकूण 62 भागीदार आहेत. या थकीत कर्जाची मुद्दल फेड करून घ्यावी, कर्जाचे पुनर्गठन करत गेल्याने शेतकर्यांची थकबाकी वाढत गेली आहे.
थकबाकीदार शेतकर्यांसाठी सरकारने अंदाजे 500 कोटी रुपयांची तरतूद करावी या मागण्यांसाठी शेतकरी विराट आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत. जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेल्या कर्जाची जुलमी वसुली जिल्हा बँकेकडून करण्यात येत आहे. याचबरोबर शेतकर्यांच्या वाहनांचा लिलाव, जमिनीचा लिलाव, जमिनीवर बोजे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वसुली दरम्यान दादागिरीचे प्रकार देखील वाढले आहेत. जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेल्या सर्वांना समान वागणूक देणे गरजेचे आहे. मात्र मोठ्या थकबाकी दाराबाबत काय कारवाई केली? असे आरोप करत या विरोधात 16 जानेवारीला आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.