घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन तात्पुरते मागे

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन तात्पुरते मागे

Subscribe

शेतकर्‍यांना पन्नास हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान तातडीने द्यावे यासह विविध मागण्यांसाठी शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे पूरग्रस्तांच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलनाचा निर्णय माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी सायंकाळी अखेर मागे घेतला. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलविल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा केली. दरम्यान, बैठक निष्फळ झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. गेले पाच दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पंचगंगा परिक्रमा पदयात्रा सुरू होती.

नृरसिंहवाडी येथे ही पदयात्रा सायंकाळी पोहोचली. तेथे झालेल्या सभेत शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा केली. राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबतचा प्रस्ताव इचलकरंजीचे प्रांताधिकारी विकास खरात यांनी शेट्टी यांना दिला. त्यानंतर शेट्टी यांनी हे आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.

- Advertisement -

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे या भागातील शेतकरी आणि इतर सर्वांचेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्वांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करावी, शेतकर्‍यांना पन्नास हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान तातडीने द्यावे यासह विविध मागण्यांसाठी शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून तीन हजारांवर कार्यकर्ते जलसमाधी घेण्यासाठी नृसिंहवाडीच्या दिशेने आले होते. काही कार्यकर्त्यांनी थेट पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमात उडी मारल्याने वाडीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पाच दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रयाग चिखली येथून पंचगंगा परिक्रमा यात्रा काढली. दुपारनंतर यात्रा कुरूंदवाड येथून वाडीच्या दिशेने निघाली. कुरुंदवाडच्या पुलावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हजारावर पोलीस कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी सज्ज होते. पण कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्यामुळे तेथे तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याची शक्यता होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -