राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. १० जूनरोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. परंतु राज्यसभेच्या ६ जागांसाठी एकूण ७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रे आणि काँग्रेसकडून प्रत्येकी १ तर शिवसेनेकडून २ आणि भाजपकडून ३ उमेदवार रिंगणात आहेत. सहाव्या जागेसाठी चुरस होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांनी अधिकची मते शिवसेनेला द्यावी असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणा-या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उर्वरीत ११ मते शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना देण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पक्षाच्या आमदारांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. शरद पवार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. येत्या १० जूनला होणारी राज्यभेची निवडणूक आणि राज्यातील आगामी पालिका निवडणुकांबाबत शरद पवार यांनी मार्गदर्शन केले.
विधानसभेत राष्ट्रवादीचे ५३ आमदार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रफुल पटेल यांना निवडून येण्यासाठी ४२ मतांची आवश्यकता आहे. प्रफुल पटेल यांना ४२ मते दिल्यावर उर्वरीत अधिकची मते शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार संजय पवार यांना द्यावीत असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक व माजी मंत्री अनिल देशमुख यांना या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करा, असेही शरद पवार यांनी सांगितले. विधानसभेत तेरा अपक्ष आमदार आहेत. त्या जिल्ह्यातील पालक मंत्र्यांनी अपक्ष आमदारांच्या संपर्कात रहावे. राज्यसभेची निवडणूक गांभीर्याने घ्या असे शरद पवारांनी सांगितले.
राज्यातल्या चौदा महापालिका निवडणुकीत आघाडीच्या संदर्भात शिवसेना आणि काँग्रेस सोबत चर्चा करण्याची सूचना यावेळी शरद पवार यांनी केली. महापालिका निवडणुकीतील आघाडीच्या संदर्भात काही समस्या असल्यास शिवसेना आणो काँग्रेस नेत्यांची चर्चा करा. ज्या महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहे त्या ठिकाणी जनता दरबार घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
हेही वाचा : काँग्रेसमध्ये नव्या नियमाप्रमाणे ५१ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, नाना पटोलेंची माहिती