भीमा कोरेगाव हिंसासचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात सबळ पुरावे न मिळाल्याने त्यांचे नाव या प्रकरणातील दोषारोपपत्रातून काढून टाकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते गुरुवारी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
यावार भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे नाव वगळण्यात आले असले तरी त्यांची सखोल चौकशी करून सबळ पुरावे शोधावेत. भिडे गुरुजींवर कारवाई होण्याबाबत आपण आग्रही आहोत, असे रामदास आठवले म्हणाले. ते पुढे म्हणाले भिडे गुरूजींवर कारवाई व्हायला पाहिजे, ही आपली मागणी कायम आहे. भिडे गुरुजींविरोधातील ठोस पुरावे तपास यंत्रणेला मिळाले नसतील, म्हणून त्यांचे नाव वगळले गेले असेल. पण तरीही त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आपण ठाम आहोत. त्यासाठी भिडे गुरुजींची आणखी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आठवले यांनी केली.
काय आहे प्रकरण –
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात भिडे यांच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ४१ आरोपीं विरोधात यापूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यात भिडे यांचे नाव दोषारोपपत्रातून वगळण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून मानवी हक्क आयोगापुढे झालेल्या सुनावणी दरम्यान नुकतीच देण्यात आली. संभाजी भिडे यांचा हिंसाचार प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे आढळून आल्याचे पोलिसांनी मानवी हक्क आयोगापुढे सांगितले. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव येथे दोन गटात हिंसाचार झाला होता. या प्रकरणात संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.