गेले तीन वर्षे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला, असं म्हणत शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आपल्या पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचं कळवलं आहे. (Ramdas Kadam resigns his party’s leadership)
रामदास कदम यांचे पूत्र आमदार योगेश कदम यांनीही शिंदेंसोबत बंडखोरी केली होती. त्यावेळी रामदास कदम म्हणाले होते की, “मुलाचं माहिती नाही, पण मी अखेरपर्यंत शिवसेनेतच राहीन.” मात्र, आज त्यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिल्याने तेही बंडखोरीच्या मार्गावर आहेत की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
हेही वाचा – शिवसेनेला अजून एक झटका, शिवसेना नेते रामदास कदम यांचा राजीनामा, शिंदेगटात जाणार?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात रामदास कदम म्हणाले की, “शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही, हे मला पहायला मिळालं. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले.”
ते पत्रात पुढे म्हणाले की, “विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला आचानक मातोश्रीत बोलवून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावर कोणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोणी काही बोललं तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही, यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवर संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे.”
हेही वाचा – ‘त्या’ अध्यादेशांची अंमलबजावणी कधी? २० दिवसांपासून राज्यपालांकडे पडून
“२०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवत होतात त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेससोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेससोबत युती करू नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल. अशी आपल्याला विनंती केली होती. पण त्याही वेळी माझं ऐकलं नाही याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेनाप्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. आणि म्हणून मी आज “शिवसेना नेता या पदाचा राजीनामा देत आहे.”