‘उद्धव ठाकरे यांना सध्या सुषमा अंधारे यांच्या पदराचा सहारा घ्यावा लागतो. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता कुणीच राहिलं नाही’, अशा शब्दांत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Ramdas Kadam Slams Uddhav Thackeray Prakash Ambedkar Alliance Sushma Andhare)
राज्यात एकिकडे शिवसेनेत फुट पडल्यानंतर दोन गट पडले आहेत. त्यानंतर शिवसेनेच्या काही नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गट आणि शिंदे गटात प्रवेश केला. शिवाय, महाराष्ट्रातील संभाजी ब्रिगेडने उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाशी युती केली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात युती होणार असल्याची चर्चा आहे. या युतीच्या चर्चांवरूनच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. “प्रकाश आंबेडकर आणि सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरेंची प्रचंड ताकद वाढणार आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा. उद्धव ठाकरे यांना सध्या सुषमा अंधारे यांच्या पदराचा सहारा घ्यावा लागतो. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता कुणीच राहिलं नाही. त्यामुळे जो येईल त्याला पक्षात घ्यायचं, हा एककलमी कार्यक्रम उद्धव ठाकरे यांनी सुरू केला आहे”, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
“प्रकाश आंबेडकर आणि सुषमा अंधारे यांच्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद प्रचंड वाढणार आहे. यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कुठे आहे? हे लोकं शोधत बसतील. आता खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांचे पितळ उघडे पडतेय, हे चांगले आहे. त्यांना खूप शुभेच्छा. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्याशी ते युती करू पाहत आहेत. आता आणखी कुणी मिळतंय का? हे उद्धव ठाकरेंनी दिवा लावून शोधावे. जी अंधारेबाई हिंदू देवतांवर प्रचंड टीका करते. तिच्या पदराचा सहारा उद्धव ठाकरेंना घ्यावा लागतोय. वरती बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला काय वाटत असेल? याची पर्वा आणि जाणीवही त्यांना नाही. त्यांच्यासोबत आता कुणीही राहिलं नाही. त्यामुळे जो येईल त्याला सोबत घ्यायचं एवढाच त्यांचा एककलमी कार्यक्रम चालला आहे”, असेही रामदास कदम यांनी म्हटले.
हेही वाचा – पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? – दिलीप वळसे पाटील